Tuesday, January 2, 2018

ये हैं बॉंम्बे मेरी जान…


ये हैं बॉंम्बे मेरी जान…..
                                                                                 -अंजली अंबेकर

मुंबईचं माझं पहिलं वहिलं एनकाउंटर कुठलं?
            थोडं फ़ार आठवतं त्या वयापासून मुंबई माझ्या सोबतंच वावरत आहे.कधी दृश्य माध्यमांतील अबस्ट्रँक्ट पेंटिंग किंवा प्रतीकं/प्रतिमांच्या स्वरूपांत नजरेसमोर असायची,कधी अदृश्य माध्यमांतून  पार्श्वसंगीतातील अनवट वाद्याच्या नादासारखी कानांत मधूनच वाजायची,तर कधी कथा-कादंबऱ्यातील  एखाद्या अजोड पात्रांसारंखी मनांत सतत नांदायची अशा विविध माध्यमातून ती माझ्या नेणिवेत होती.तिची  जाणिवेतील पहिली आठवण म्हणजे माझी आजीने सांगितलेल्या एका घटनेची. माझी आजी स्वातंत्र्यपूर्व काळात आजोबांसोबत काही वर्षं मुंबईत होती . सन १९४२ च्या चले जाव चळवळीच्या काळातलं मुंबईच्या आज़ाद हिंद मैदानावरील महात्मा गांधींचं भाषण तिने ऐकलं होतं आणि त्या बद्दल ती आम्हाला भारावून सांगायची.तिचं  ते सांगणं ऐकून मुंबई अशी भारावलेल्या अवस्थेत डोळ्यासमोर यायची ,ते ऐकूनच  मुंबई मला spiritual की काय अशीच वाटायला लागली होती.महात्मा गांधींच्या व्यक्तित्वाने  भारावून जाण्याची सुरुवात ही माझ्यासाठी मग मुंबईशीच संबंधित झाली .असा  सगळ्या मुंबई संदर्भातील जाणीवे -नेणिवेतील गोष्टीचा  कोलाज माझ्या मनांत प्रत्यक्ष भेटीआधीपासूनही नांदता होता .
        तरी पण या सगळ्या धूसर प्रतिमांच्या/visualise करण्यात आलेल्या  आठवणींपेक्षा मुंबईच्या आणि माझ्या एनकाउंटर ची स्पष्ट स्वरूपाची  आठवण ही या सर्वांपेक्षा वेगळीच आहे .
  सन १९८८ ला मीरा नायर चा “सलाम बॉम्बे “ हा चित्रपट रिलीज झाला. तेव्हा लगेच किंवा त्या नंतर कधीतरी मी तो मोठ्या पडद्यावर बघितला . त्या चित्रपटांत  शफीक सईद नावाचा बालकलावंत मुंबईतील अस्ताव्यस्त रस्त्यांवर धावतानाची काही दृश्यें दिसतात आणि ती दृश्यबद्ध करण्यासाठी अमेरिकन सिनेमेटोग्राफ़र सँडी सियोल चा कँमेरा मुंबईतील काटकोन त्रिकोणातील अणू रेणूंना दृश्यबद्ध करत पुढे पुढे सरसावत जातो.आणि त्याचा परिणाम अधिक गडद करणारा एल.सुब्रम्हण्यम यांचा अप्रतिम साऊंडट्रॅक मागे वाजत राहतो  . या सगळ्याचा टोटल इफ़ेक्ट म्हणजेच   पहिली ठळकपणे मनावर ठसलेली मुंबईची दृश्य पद्धतीची गडद आठवण.
          त्यानंतर कैक वर्षांनी   मुंबईत प्रत्यक्ष पहिलं पाऊल ठेवलं .त्यानंतर मात्र  अनेक प्रतिमा-प्रतीकांचे संदर्भ त्याला असूनही   मुंबईचं आणि माझं आजपर्यंतचं नातं सदा सर्वकाळ सुखनैव किंवा कलाभिमुख राहिलं आहे असं  नाही . त्यांत आता किती तरी अर्थाचे ,भावनेचे आणि वास्तवाच्या विविध रंगांचे पदर येऊन मिसळले आहेत. ते कधी सरळ पोताचे भासतात तर कधी अनंत गाठींचे झाले आहेत असं ही जाणवतं . 
                                त्याचं आकलन करून घेण्यासाठी काही गोष्टी सुरुवातीलाच  मुक्कमल कराव्या लागणार आहेत ,त्यापैकी एक म्हणजे मुंबईबाबत या सगळ्या पार्श्वभूमीवर पहिल्या प्रत्यक्ष भेटीत माझं झालेलं  मुंबईबाबतचं इम्प्रेशन . मी व्यावसायिक  कारणांनी  मुंबईत पहिल्यांदा आले.   महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत  माझी वयाच्या बाविसाव्या वर्षी वित्त अधिकारी म्हणून निवड झाली होती आणि त्या संदर्भातील  दोन महिन्यांचं प्रशिक्षण घेण्यासाठी मी  मुंबईत पहिल्यांदा पाऊल ठेवलं .औरंगाबादहून येणाऱ्या ट्रेनमधून मुंबईत  उतरले तेच  मुळी प्रचंड गर्दीच्या दादर स्टेशनवर आणि तेव्हा पहाटेचे साडे तीन वगैरे वाजले असावेत . दादर चा सुप्रसिदध  फूट ओव्हर ब्रिज  वरून चालताना ,त्यावर झोपलेल्या असंख्य माणसांमधून वाट काढत पुढे जात असताना काही अस्फुटसे आवाज आले म्हणून वळून बघितलं तर तिथे उघड्यावर रतिक्रीडा करणाऱ्या  एका स्त्री -पुरुषाची जोडी होती . क्षणभर काय चालले आहे ते  कळाले नाही . क्षणभराने भानावर आल्यावर ते  दृश्य बघून  मनाचा  थरकाप झाला .  मुंबई चा हा पहिला वाहिला शारीर अनुभव . त्याच मनःस्थितीत दादर स्टेशन च्या बाहेर पडलो तेव्हा राहण्यासाठी कन्फर्म असा कुठला आसरा नव्हता . सोबत एक मैत्रीण आणि तिची आई . त्या दोघीना मुंबई चा थोडासा अनुभव होता आणि त्यांनी वरळी चा शासकीय विश्राम गृहात आमची राहण्याची व्यवस्था केलेली . पण त्याचा नीटसा पत्ता त्यांना ठाऊक नव्हता आणि त्यांनी आमच्या  रूमचं आरक्षण ही कन्फर्म झाल्याची खात्री ही  केली नव्हती . त्या काकू सोबत आहेत म्हणून मी किंवा माझ्या घरच्यांनी ही फार खोलात जाऊन त्याची काळजी घेतली नव्हती . वयाच्या बाविसाव्या वर्षांतलं ते धाडस . त्या अनुभवाचा घेतलेला धसका म्हणा किंवा मनाचं वरचेवर कमी होत गेलेलं डेअरींग यापैकी काहीही . पण असं काही करण्याचं धाडस  मी पुन्हा केलं नाही . वरळी शासकीय निवासस्थानात आमचं आरक्षण झालंच नव्हतं. ज्या व्यक्तीला आरक्षणासंदर्भात फोन केला होता ,त्या व्यक्तीने ती गोष्ट व्यवस्थापनाला कळवलीच नव्हती . आणि नेमकी त्या दिवशी ती व्यक्ती ही  हजर नव्हती . या गोंधळात मात्र आम्ही अक्षरशः रस्त्यावर होतो . आम्ही विनंती केल्यावर त्या रात्रीपासून  आमच्या तिघींमधे तीन दिवसांसाठी  एक रूम द्यायला ते कसे बसे तयार झाले . दिवसभर ट्रेनिंग च्या ठिकाणी होतो पण  फ्रेश होण्याचा मुद्दा होताच . पैसे असले तरी सरसकट हॉटेल मध्ये रहायला जाण्याचं  चलन तेव्हा अस्तित्वातही नव्हतं .म्हणून तसे काही करण्याचा पर्याय  सुचला नाही एवढे खरे .   मग कसे बसे तिथल्याच सार्वजनिक  प्रसाधन गृहात तयार झालो आणि सामान दिवसभर सोबत घेऊन प्रशिक्षणाच्या ठिकाणी गेलो . सगळ्या प्रशिक्षणार्थी असताना ते सामान सोबत घेऊन फिरणं लाजिरवाणं  वाटत राहिलं . तेव्हा ठरवलं की आता आपण आपलीच राहण्याची व्यवस्था मुंबईत तरी करायला हवी . कुणावर अवलंबून राहण्यात अर्थ नाही . त्या घटनेने माझी त्याबाबतीतली  भूमिका कायमची ठरली गेली.  त्यामुळे मुळात असलेली स्वतंत्र वृत्ती अधिकाधिक स्वतंत्र होत गेली . मुंबईत पहिलं पाऊल टाकल्याक्षणी मिळालेला मोठा धडाच होता तो .
                 तीन दिवसाच्या वरळी शासकीय विश्रामगृहातील अनुभवानंतर मी अजून दुसऱ्या एका मैत्रिणी सोबत बांद्रा पूर्व येथील कार्डिनल स्कुल च्या बाजूला असणाऱ्या श्रम साधना या वर्किंग विमेन हॉस्टेल ला पुढच्या कालावधीसाठी राहिलो . सोळा ते पंचावन्न अशा वयोगटातील महिला त्या हॉस्टेल मध्ये रहायच्या .
विविध स्तरातील मुंबईत काम करणाऱ्या सिंगल विमेन साठीचं ते हॉस्टेल होतं . योगायोगाने माझं एक दूरचं नातेवाईक कुटुंब हॉस्टेल पासून हाकेच्या अंतरावर राहत होतं . त्यामुळे अधून मधून त्यांच्याकडे जाण व्हायचं.  त्यांच्या मुली माझ्याच वयाच्या होत्या . मुंबईच्या  सांस्कृतिक पार्श्वभूमीचं  सर्वाधिक मला  आकर्षण होतं. म्हणून मी काकांकडून आणि त्यांच्या मुलींकडून शिवाजी मंदिर ,रिदम हाऊस ,एन . सी . पी .ए किंवा जहांगीर आर्ट गॅलरी अशा ठिकाणांचे पत्ते तिथे जायचं कसं हे विचारून ,ते डायरीत लिहून घ्यायचे . मोबाईलचं युग अजून अवतरलेलं नव्हतं .म्हणून डायरीची महत्वाची सोबत असायची आणि ट्रेनिंग संपलं की शासकीय गदारोळात न अडकता  माझी मग  मुंबईतील भटकंती सुरु व्हायची .त्या दोन महिन्यातील साठ दिवसांच्या  कालावधीत मी १५-१७ मराठी ,दोन हिंदी नाटकं बघितली  आणि एक शास्त्रीय संगीताची मैफल ऐकली होती. ती बहुधा बेगम परवीन सुलताना यांची होती .  असंख्य पुस्तकं आणि सीडीज खरीदल्या होत्या .प्लॅनेट एम तेव्हा टाईम्स बिल्डिंग मध्ये नुकतंच सुरु झालं होतं आणि सीएसटी स्टेशन समोरचं मॅकडोनाल्ड ही त्याच काळातलं .मला मात्र शेवटपर्यंत ऱ्हिदम हाऊस हेच संगीतातील तीर्थ स्थानासारखं वाटत राहिलं . तीच गोष्ट स्ट्रॅन्ड बद्दल ही म्हणायला हवी . हुतात्मा चौकातील रस्त्यावरील पुस्तकांच्या दुकानातून किती तरी पुस्तकं घेतली आणि ती किती तरी वर्षं मला पुरली .  ऱ्हिदम हाऊस मधून आणलेल्या  वीणा सहस्र्बुद्धे ,कुमार गंधर्व, मालिनीताई राजूरकरांचं संगीत अजून ही पुरतंय . सोबतच मुंबई शहरातील  गर्दीचा,प्रवासाचा  सकाळी बाहेर निघाल्यापासूनच अव्यक्त ताण मनावर सतत असायचा  आणि तो दिवसभर जाणवायचा . एवढी वर्षं झाली तरी त्यात अजून बदल नाही .

                          एकदा प्रशिक्षण काळात माझे वडील मला मुंबईत एकदा भेटायला आले होते . मग माझी ओळख करून देण्यासाठी ते मला मुंबईत राहणाऱ्या दुसऱ्या काकांकडे घेऊन गेले . ते काका राहायचे अंधेरीतील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मध्ये . आम्ही ट्रेन ने बांद्रा ते अंधेरी असा प्रवास गर्दीच्या वेळी केला आणि अंधेरी स्टेशनवर पोचलो. अंधेरी स्टेशनवर ची ती भयावह गर्दी आणि  त्यातून ही तासाभराच्या झटापटीनंतर ऑटो मिळाला. या सगळ्याचा सामना करून आम्ही काकांकडे पोचलो . काही वेळ आम्ही त्यांच्याकडे होतो ,त्याच दिवशी माझे पिरिअड्स संपत आले होते.त्यांच्या घरून निघताना  मी वॉश रूम ला जाऊन आले  आणि या सगळ्या ताणामुळे की अजून  कशामुळे माहित नाही  पण मी माझे सॅनिटरी पॅड त्यांच्या वॉश रूम मध्ये विसरले आणि तसेच आम्ही तिथून निघालो . रात्री परत येताना ट्रेन मध्ये मला ते आठवलं आणि जाम टेन्शन आलं . बांद्रा स्टेशनवर उतरल्यावर पब्लिक बूथ वरून त्या काकूंना फोन केला आणि सॉरी म्हणाले . त्या ते ऐकून होतं गं असं कधी कधी म्हणाल्या पण वरनं  तुम्ही गावाहून आलेल्या मुलींना अशा सवयी नसतात ना ,मुंबईतील मुली या बाबतीत पर्टिक्युलर असतात वगैरे ऐकवलंच . या घटनेला वीस वर्षाहून अधिक काळ झाला आहे . दरम्यान मी ही मुंबईच्या गर्दीचा भाग झालेच .त्या काकूंची आणि माझी पुन्हा कधी भेट ही झाली नाही . तशी ही माझी जनरलाईज मेमरी चांगली नाहीच .पण मला ही घटना अद्याप  विसरता आलेली नाही .त्यानंतर  मी ही अनेकदा मुंबईतील पब्लिक टॉयलेट्स वापरते ,म्हणजे त्याला काही पर्याय ही नसतो . ती पब्लिक टॉयलेट्स  वापरणाऱ्या बहुसंख्य महिला ही मुंबईच्याच असतात. तिथे अनेकदा इतस्ततः सॅनिटरी पॅड्स पडलेली असतात सार्वजनिक ठिकाणच्या डस्टबिन्स मधील कचरा जिथे तिथे ओथंबून वाहत असतो आणि त्यातून   प्रामुख्याने व्यवस्थित पॅक न केलेले पॅड्स डोकावत असतात . तेव्हा मला आवर्जून त्या वेगळ्याच मुंबईत राहणाऱ्या काकूंची आठवण येते.मुंबईत राहणाऱ्या लोकांचा दांभिक दर्प अजूनही जाणवत राहतोच .
                                         माझं  मुंबईतील प्रशिक्षण संपल्यावर परभणीत पोस्टिंग झालं आणि मी तिथे रुजू झाले . तिथे मी प्राथमिक शिक्षणाच्या प्रकल्पावर काही वर्षं काम केलं . त्याचं मुख्य कार्यालय मुंबईत होतं.  त्यामुळे महिन्यातून एकदा तरी मुंबईत बैठकांच्या/वर्कशॉप च्या  निमित्ताने येणं व्हायचं आणि अशा पद्धतीने मी पुन्हा मुंबईशी जुळल्या गेले .या वेळची मुंबई माझ्यासाठी अधिक निकाली ढाकळी होती . दीर्घ काळ वास्तव्याचं भूत मानगुटीवर बसलेलं नव्हतं आणि एक-दोन दिवसासाठीची ती मजाच असायची .  मुंबईतील बैठका अनेकदा शुक्रवारी असायच्या . तेव्हा बैठक झाली की मी अनेकदा अंधेरीत माझे मित्र श्यामल -मंगेश या माझ्या मित्रांकडे जायचे . मग आमची एकत्रित  मुंबई स्वान्तसुखाय केलेली  भटकंती ,सांस्कृतिक उपक्रमांना भेटी असे कार्यक्रम व्हायचे . दोन दिवसांच्या धावपळीतही अशोक जैन सरांना त्यांच्या घरी भेटायला जाणं  व्हायचं . मग त्यांच्याशी झालेल्या चर्चेतूनही माझ्या मुंबई एक्सप्लोर  करण्याच्या उपक्रमाला वेगळं परिमाण लाभायचं.  अशाच भेटींमधून माझा प्रभात चित्र मंडळाशी संपर्क झाला आणि मी जागतिक चित्रपट अधिक जाणतेपणाने बघायला लागले . मग त्या नंतर ची तीन -चार वर्षं मी नेमाने पंढरीच्या वारी सारखे थर्ड आय (आशियाई चित्रपट महोत्सव ) आणि मामि (मुंबई मुविंग इमेजेस) )यांच्यातर्फे आयोजित केला जाणारा जागतिक चित्रपट महोत्सव नेमाने सुटी टाकून बघायला लागले आणि त्यासाठी माझी मुंबईची वारी ही ठरलेलीच होती . या सांस्कृतिक उपक्रमांसोबत मुंबई ची ही एक शहर म्हणून ,एक कॅरेक्टर म्हणून ओळख होत होतीच . त्यातला भौगोलिक ,सामाजिक आणि आर्थिक संदर्भासोबतच प्रत्येकाचा वैयक्तिक असा संदर्भ त्याला चिकटून आहे ,हे ही हळूहळू लक्षात येत गेलं . मी मुंबई सोडून परभणी ,पुणे आणि औरंगाबाद या शहरातही दीर्घकाळ वास्तव्य केलेलं आहे . परंतु मुंबईचं जसं समूहातलं बहुतांश जगणं असूनही प्रत्येक माणसासोबतचं एक असं स्वयंभू नातं जुळतं तसं इतर शहरांचं  झालेलं दिसत नाही . मुंबईतील प्रत्येकांनाही सतत समूहाचा भाग असल्यामुळे कदाचित त्यातूनही स्वतःची स्पेस शोधण्याचं कसब साधलंय त्यातंच मुंबईच्या आणि मुंबईत राहणाऱ्या प्रत्येकाच्या नात्याचं मूळ धरून असलं पाहिजे . म्हणून प्रत्यक्षात मुंबईत येण्यापूर्वी  ही माझं जे मुंबईशी नातं तयार झालं त्यात अशा पद्धतीने साहित्यातून, चित्रपटातून व्यक्त झालेल्या अनेकांच्या अभिव्यक्तीचाही  मोठा सहभाग होता . विक्रम चंद्राचं Love and longing in Mumbai किरण नगरकरांच्या आणि भाऊ पाध्येंच्या लिखाणातून अव्याहत वाहणारी मुंबई ,गंगाधर गाडगीळांचं “प्रारंभ”
जयवंत दळवींच्या लिखाणातून डोकावणारी खानावळी संस्कृतीची मुंबई ,श्री.दा.पानवलकरांच्या कथांमधून दिसणारी कडेकपारीतील मुंबई,मेघना पेठेंच्या कथांमधून बाहेर येणारी गर्दीतील अकेली मुंबई ,के.ए . अब्बास यांचा “बम्बई “हा लेख आणि त्यातून भटकत जाणारी पत्रकारीतेतील  मुंबई . लाईफ इन मेट्रो ,स्लमडॉग मिलिऑनर ,धोबी घाट ,लंच बॉक्स इ. अशा असंख्य चित्रपटातून जाणवत गेलेली मुंबई . अशा एक ना अनेक मुंबईच्या इमेजेस मनांत वावरत होत्या . सुरुवातीच्या काळात या मनातल्या इमेजेस मी शोधत असायचे ,पण असं करता करता माझ्या स्वतःच्या इमेजेस तयार होत गेल्या आणि त्यांत मी इतरांचे रंग न शोधात स्वतःचे रंग मिसळायला लागले आणि माझं मुंबईचं चित्र नव्याने आकार घ्यायला लागलं .


 .
                   काही वर्षांनी माझी परभणीहुन औरंगाबाद ला बदली झाली. या पोस्टींग मध्ये मात्र मुंबईत यायचं ऑफिशिअल काही कारण नव्हतं.  औरंगाबाद ला माझं महाविद्यालयीन शिक्षण झालं होतं,तेव्हा मी बरीच वर्षं औरंगाबाद ला होते त्यामुळे तसा माझा  औरंगाबाद ला जुना गोतावळा होताच . फक्त तो या पोस्टिंगच्या निमित्ताने मधल्या काही वर्षांच्या गॅप नंतर पुन्हा नव्याने वेगळ्या परिवेशात भेटला.औरंगाबाद ला  आमची सांस्कृतिक घोडदौड जोरात चालू होती . आम्ही औरंगाबाद मधला पहिला पुलोत्सव घेतला ,दृष्टांत फिल्म सोसायटी ची स्थापना केली असं बरंच काही सांस्कृतिक आम्ही करत होतो . मी माझं स्वतःचं असं घर ही घेतलं आणि मी खरंच मध्यमवर्गीय परिभाषेतील शेटल झाले . :-) . औरंगाबाद हे शहर माझ्यासाठी कायम कोझी असं राहिलं आहे . तिथल्या सगळ्या गोष्टी आवाक्यातील वाटतात . मुंबईत तो कोझीनेस नाही . तुमच्या नजरेच्या किंवा श्वासाच्या टप्प्यात इथे काहीच नाही . औरंगाबादच्या mindful असण्याच्या काळात  माझ्या मुंबईच्या फेऱ्या मात्र कमी झाल्या  होत्या .मी मुंबई पासून काही काळ दुरावलेच . परंतु त्यानंतर कधी तरी सतीशची (नवरा )  आणि माझी ओळख झाली ,आम्ही  एकमेकांना भेटत होतो .तो मुंबईचा आणि टेलीग्राफ या वृत्तपत्रांत काम करत होता. मग मुंबईचं आणि माझं नातं ब्रेक नंतर पुन्हा जुळलं . सतीशमुळे मुंबई बघण्याला आणि अनुभवण्याला आगळं परिमाण लाभलं . त्याचं मुंबईतलं विश्व ,मी आत्तापर्यंत फिरत होते त्या मुंबई पेक्षा वेगळंच . मी अधिकारी म्हणून कार्यरत असले तरी मुंबईत पटकन टॅक्सी करायचा माझा धीर व्हायचा नाही . त्याच्यासोबत मात्र मी टॅक्सीवाली मुंबई अनुभवत होते . सतीश आणि मुंबई  माझ्यासाठी समानार्थीच होते . सतीश शी लग्न करण्याचा निर्णय म्हणजे मी औरंगाबाद सोडून मुंबईत शिफ्ट होणं याचा निर्णय घेणं होतं आणि अर्थात ते माझ्यासाठी सोपं नव्हतंच .औरंगाबाद मुळे आलेली सेटलमेंट ची भावना मला खूप महत्वाची वाटत होती . इतक्या वर्षाच्या धावपळीनंतर मिळालेलं मनःस्वास्थ्य मला घालवायचं नव्हतं. पण शेवटी  माझी  शासकीय नोकरी असल्यामुळे मला इथे बदली करून घेणं शक्य होतं आणि सतीश इंग्रजी पत्रकारितेतील असल्यामुळे त्याला औरंगाबादला येणं व्यावसायिक दृष्ट्या शक्य नव्हतं हा व्यवहार्य भाग निर्णय घेताना शेवटी महत्वाचा झाला . तो मुंबईचा असूनही संयुक्त कुटुंबात राहायचा आणि मी औरंगाबाद सारख्या छोट्या शहरातही स्वतंत्र राहायचे. मी रूढ अर्थाने एकटी राहायला लागून ही तेव्हा सात वर्षाहून अधिक काळ झाला होता . एकटेपणाचे मला व्यसनच जडले होते , दिवसभर माणसांच्या गोतावळ्यात राहून संध्याकाळचा तो एकांत मला हवाहवासा वाटायचा . माझी पुस्तकं ,सीडीज ,फिल्म्स माझी आवर्जून वाट बघायचे . इथे तर  मुंबई सारख्या भयावह गर्दीच्या ठिकाणी राहायचा  तर मी औरंगाबाद सारख्या तुलनेत कमी गर्दीच्या शहरांत राहायचे . म्हणून आम्हाला लग्नाचा निर्णय घ्यायला इतर कारणांसोबत मुंबई या कारणामुळे ही विलंब झाला. आम्ही लग्न केल्यावरही सहा महिने मी औरंगाबादलाच होते ,त्यानंतर माझी ठाण्यात बदली झाली. ठाणे हे शहर हे मुंबईचाच कांदिवली किंवा मुलुंड सारखा भाग आहे . प्रशासकीय दृष्ट्या त्याचं वेगळं अस्तित्व असलं तरी त्याला मुंबईपासून वेगळं असं अस्तित्व नाही .  म्हणून आमचं घर जरी ठाण्यात असलं तरी आम्ही फक्त काही वेळेसाठीची सोय म्हणून ठाण्याकडे बघणार होतो याची पूर्ण कल्पना आम्हाला होती . सुरुवातीची दोन-तीन वर्षं घरापासून ठाण्यातलं ऑफिस जवळ असल्यामुळे प्रवासाचा त्रास नव्हता आणि माझा मुलगा तेव्हा तान्हा असल्यामुळे ते सोयीचं झालं . तीन वर्षांनी माझी बदली थेट नरिमन पॉईंट च्या ऑफिस मध्ये झाली आणि रोजचं माझं मुंबईचं अफेयर तेव्हा  खऱ्या अर्थाने सुरु झालं. 


                                          पहिला भाग अर्थातच लोकल ट्रेनचा प्रवास  . गेली आठ -दहा वर्षे मी ट्रेन ने ऑन /ऑफ असा प्रवास करायचे परंतु  त्यात ठराविक वेळेचा प्रवास असं काही टार्गेट नसायचं . त्यामुळे ती प्रवासाची  दाहक वास्तविकता  माझ्यावर कोसळली नव्हती . आता रोज ऑफिस ला ठराविक रश अवर्स मध्ये जाणं भाग होतं  आणि  त्याचा खूप ताण ही यायचा मनांवर . मला आठवतं ,सुरुवातीच्या काळात आमच्या सोसायटीच्या या प्रवासासाठी सराईत असणाऱ्या मैत्रिणींसोबत बऱ्याचदा मी प्रवास करायला लागले होते . एकदा कल्याण फास्ट पकडल्यावर त्या मैत्रिणी दिसल्या म्हणून मी फक्त माझ्या हातातील बॅग बाजूच्या सीट वर ठेवली. तिची जागा पकडावी असं ही एकदम डोक्यात आलं नाही किंवा लोकल संस्कृती मध्ये हे चालत नाही हे काही मला ठाऊक ही नव्हतं . त्यांना हे अर्थात माहीत होतंच.  म्हणून त्या जागेवर त्या  बसल्या नाहीत परंतु या एका गोष्टीवरून बायकांनी एकदम कल्ला सुरु केला. अर्वाच्च्य शिव्या आणि प्रकरण माझ्या शिक्षणापर्यंत आणि आई - वडिलांपर्यंत पोचलं . मी काही स्पष्टीकरण देणार तितक्यात मैत्रिणीने पटकन गप्प बसण्याची खूण केली . पण पुढचा चाळीस -पन्नास मिनिटांचा प्रवास humilation या शब्दाचा काय अर्थ असतो हे आयुष्यात पहिल्यांदा मला कळालं . काही कारण नसताना मला ते सहन करावं लागलं . कल्याण फास्ट मधला वेग माझ्यापुरता कमी झाल्यासारखा वाटला . त्या ट्रेन मधला एकेक क्षण युगासारखा भासत होता .  दोन स्टेशन्स मधला निश्चित वेळ अकारण वाढलेला वाटत होता . ठाण्यात पोचल्यावर एकाच ऑटो मध्ये आम्ही मैत्रिणी बसलो होतो पण एकमेकींशी एक  शब्द ही न बोलता घरापर्यंत पोचलो .  या प्रसंगानंतर  किती तरी दिवस मी त्या मैत्रिणींना  टाळायचे. मुद्दाम नेहमीची ट्रेन सोडून प्रवास करायचे . या सगळ्यांत माझा काहीच दोष नव्हता पण शरमेने मी बराच काळ थिजून गेले होते . 
                                          त्यानंतर  वर्षंभर मी बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स च्या ऑफिस मध्ये पोस्टिंग ला  होते . प्रवासाच्या दृष्टीने ते तसं कमी ताणाचं होतं . एसी बसेस ने मी तो प्रवास करायचे ,ट्रॅफिक  मध्ये बराच वेळ जायचा   हे कारण सोडलं  तर एकुणात  मुंबईच्या इतर प्रवासाच्या मानाने ते  फारंच सुखावह होतं . त्यानंतर प्रवासाच्या धबडग्यांत स्वत:ला झोकून दिलंच.त्याबाबतची कुरकुर कमी होत होत गेली . ती पूर्णपणे थांबली किंवा थांबेल  असं नाही . मुंबई हा विषयच लोकल ट्रेन च्या प्रवासाशिवाय सुरु होऊ शकत नाही आणि संपू ही शकत नाही . पन्नास -पन्नास वर्षं प्रवास करून ही त्या विषयी अटीतटीने चर्चा करणार्यांचं मात्र अजूनही कौतुक वाटतं.तीनच वर्षांत मी नरिमन पॉईंट ,बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स करून पुन्हा प्रभादेवी इथे पोचले.  पहिलं पाऊल जिथे ठेवलं त्या दादर स्टेशनातूनच  आज मी रोज प्रवास करते . थोड्याशाही नैसर्गिक बदलांचा ताण सहन न होणारं हे शहर पाहिलं  की हटकून औरंगाबाद ची आठवण येते . नवीन जेव्हा माझा ट्रेन चा प्रवास सुरु झाला तेव्हा एक दिवस ट्रेन च्या अलोट गर्दीत स्फुंदून स्फुंदून एकटीच रडणारी मुलगी बघितली . ते पाहून कुणी ही तिला काही विचारलं नाही . ते पाहून मी फार अस्वस्थ झाले होते . दिवसभर त्या मुलीचा विषयच डोक्यात होता . अशा अनेक प्रसंगी माझ्या जुन्या जाणत्या कनवाळू  शहराची ,गावाची आठवण यायची.माझ्या शहरांत तर सतत सहृदयता नांदती होती असं उगीचच वाटून जायचं . मन मग  मुंबईला कोसायचं आणि मुंबईचा द्वेष द्वेष करायचं .

     शहरातील सरत्या दिवसांसोबत माझी मी ही बदलत जातेय . अजून ही दोन तीन दिवसांनी सकाळच्या वेळी डोळ्यात पाणी येणारी एकाकी पडत गेलेली कुणी तरी प्रवासात भेटतेच.  तिला बघून , मी दोन क्षण अस्वस्थ होते आणि ती अस्वस्थता  प्रवास संपल्यावर विरून ही जाते. मुंबईतील सराईतासारखं मी ही माझं आयुष्य जगायला पुढे निघून जाते .

               कधी तरी आभाळ भरून आलेल्या संध्याकाळी miss you असा धावत्या ट्रेन मधून कळवळून कुणाला तरी मेसेज करावासा वाटतो . मुंबईतील माझे सुहृद त्या त्या वेळी प्रवासांत असतील असं मनांत येऊन त्यांच्याशी होऊ घातलेला संवाद मनातच खुंटतो . अवाढव्य पसरलेल्या शहरांत माझ्या बिंदू एवढ्या अस्तित्वाची जाणीव तशीच आतल्या आत विरघळून जाते आणि मी मग लगेच दुसऱ्या क्षणांत उडी घेते . 
                                 प्रत्येकवेळी आर्थिक गणितच असतात असं नाही .  पण मुंबईत माणसं एकमेकांच्या निर्हेतुक असे फार काळ  संपर्कात राहत नाहीत .त्याचं फार कुणाला गम्य वाटतं असं ही दिसून येत नाही . किती तरी माणसं अशीच माझ्या आठ वर्षांत आयुष्यात आली आणि पावलांचे ठसे ही न उमटवता ही निघून गेली आहेत . वर्तमानातील क्षणाचं उपयुक्तता मूल्य जोखून दुसऱ्या क्षणांत पोचण्याची अपरिहार्यता त्यामागे असावी.नक्की सांगणं कठीण आहे . अशा वेळी मुंबई माझ्यासाठी  एकदम परकी परकी होऊन जाते .           
           कधी तरी मुंबईच्या फोर्ट भागांत आम्ही चार -पाच मैत्रिणी ड्रिंक साठी एखादी संध्याकाळ गाठतो . फोर्ट परिसरातील सात नंतरची संध्याकाळ आपल्याभोवती  शांत पहुडलेली दिसते  . ती अनुभवण्यासाठी  कधी तरी सहा महिन्यातून एकदा ती संध्याकाळ  गाठवीशी वाटतेच . समोर असणारा बडवाईजर चा  फेसाळता ग्लास आमच्या मनातला कल्लोळ त्याच्या गोल्डन ब्राउन रंगाच्या द्रवामध्ये शोषून घेतो .तिथून आम्ही एका वेगळ्याच तंद्रीत त्यानंतर  सीएसटी स्टेशनवर येतो आणि त्या पुढच्या  घरापर्यंतच्या  थकवणाऱ्या प्रवासाचं
काहीच वाटत नाही.
            
      अनेक तल्लिनतेचे क्षण मुंबईतील एन.सी.पी.ए. ,नेहरू सेंटर आणि षण्मुखानंद मधल्या मैफली ऐकताना ही मिळत असतात . ऱ्हिदम हाऊस आणि सामोवार चं कालौघात नाहीसं होणं वेदनादायी होतं . ती मला माझ्या एखाद्या जवळच्या सुहृदासारखीच होती . मुंबईत येऊन मी अशा सांस्कृतिक उचापत्या बऱ्याच करायला शिकले . संजना कपूर चे जुनून उपक्रम ,पृथ्वी चे थिएटर फेस्टिवल्स ,बॅनियन ट्री /पंचम निषाद च्या मैफली थर्ड आय /मामि चित्रपट महोत्सव इ उपक्रमांना मी पंढरीच्या वारीसारखी नियमित हजेरी लावणं हे सगळं माझ्या रुटीन चा भाग झाला आहे .  लोकल च्या /रस्त्यावरच्या भयावह गर्दीत षण्मुखानंद मध्ये नुकतीच ऐकलेली मैफल कानाशी येते आणि गर्दीचा ,घामाने भिजलेल्या शरीराचा श्वासोश्वासाच्या भाऊगर्दीचा क्षणभर विसर पडतो .मग लक्षात येतं की दिवसा  उजेडीच्या आणि गडद रात्र अंधाराच्या कुठल्याही प्रहरांत जसा  राग छायानट आपल्यात भिनत जातो तशी  मुंबई माझ्यात हळूहळू भिनत जातेय .

                             अवचित एखादी संध्याकाळ  चुकारपणे अशीही  येते ,पुन्हा औरंगाबाद ,परभणी आणि गंगाखेड च्या वाटांकडे डोळे लागतात आणि थोडं वळून बघितलं की लक्षात येतं की वाटा पुसट झाल्या आहेत.  आता परतीचा लख्ख रस्ता इतक्यात तरी  मिळणार नाही आणि मी थांबते .
   Youtube वर ऐकलेलं नॅन्सी गिफिथ या अमेरिकन गीतकाराचं नुकतंच ऐकलेल्या Rita Mcneil  यांच्या you can,t go home again या गाण्यातील ओळी आठवतात. .


                  
You can't go home again
You can't go home again
And trying to hold yesterday
Is like arms around the wind            
               घरी गौरी देशपांडेच्या अनेक कथा कादंबऱ्यांत रेखाटलं गेलं आहे  असं  नवऱ्यासारखं   कुठल्याही परिस्थितीत स्थितप्रज्ञ राहू शकणारं पाञ असतं ,झऱ्यासारखं खळाळतं मूल असतं आणि सोबत असंख्य मित्र मैत्रिणी  या  शहरांत विखुरलेले    असतात . असं सगळं असताना ही माझं आणि मुंबईचं नातं मात्र  वरचेवर  स्वयंभू ,स्वतंत्र आणि स्वयंप्रकाशी होत असल्याची जाणीव होत आहे  .
              मृणाल सेन यांनी, त्यांच्या “Always being born “या आत्मचरित्रांत कोलकाता शहराविषयी जे लिहिलेय ,तेच मला मुंबई बाबत आलटून पालटून किंवा सतत म्हणावंसं वाटतं,
Mercilessely maligned ,dangerously loved city .

                                                                                       




No comments:

Post a Comment