Tuesday, January 2, 2018

रानझरा ओळखीचा ,तहानेची बोली

रानझरा ओळखीचा ,तहानेची बोली
गालिब आणि ग्रेस
रुणझुणतच कविता आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात येते ,तशीच माझ्याही आयुष्यात आली ,कवितेच्या त्या आगमनाचे ते थरथरते पडसाद अजून ही जाणवतात . कधी ती झिमझिमत मनात बरसत राहिली, तर कधी तिने भावनेच्या खोल तळाशी पोचवून मला अंतर्मुख केले ,त्या भावगर्भी शब्दांशी जुळलेल्या मनाचे धागे मला स्वतःला स्वतःशी जोडण्यात मदतीचे ठरतात . मला स्वतःला मनात टिपकागदासारखी शब्दांना अर्थासह शोषून घेणारी ,वेळोवेळी त्यातून अर्थाचे विविधरंगी भावविश्व उलगडणारी मनस्विनी कविता भावते . तिच्याशीच माझं आत्मीय नातं निर्माण होतं .
कवितेच्या या प्रांतात शिरल्यावर माझ्या आयुष्यात दोन माणसं आली ,एक होता गालिब आणि दुसरा ग्रेस . ग्रेस ना गालिब त्यांचे सहोदर वाटायचे . गालिब चं ग्रेस बद्दलच काय मत होतं ,हे कळणं कधी शक्य नाही .
हे सगळं मनात येत राहतं एकाच वेळी ,मला गालिब ,ग्रेस एकामागोमाग आठवतात . त्यांच्या कविता ,शायरी ही एकामागोमाग व्याकूळ करते . मी ही मनातल्या मनात त्यांचे माझ्याशी जुळलेल्या भावबंधाची मनातल्या मनात उजळणी करून घेते .
गुलजार ने दिग्दर्शित केलेल्या गालिबच संगीत दिलं होतं जगजीत सिंगांनी ,त्यामुळे नसीर ,गुलजार, जगजीत ,गालिब अशी सूत्रबद्ध ओळख माझ्या मनात ठसली होती ,त्यानंतर बेगम अख्तर पासून ते आबिदा पर्यंत सगळ्यांनी गायलेला गालिब ऐकला ,पण मनात जगजीत च्या आवाजातलाच गालिब उतरला . चित्रा चा आवाज एरवी मला खूप भावतो असे नाही ,पण गालिब तिने प्राणातून गायला आहे ,रोयेंगे हम हजार बार ,कोई हमे सताये क्यो ?असं ऐकताक्षणी सगळ्या आयुष्यातलं दुखं डोळ्यातून कोसळेल की काय असं वाटतं . गालिब च्या कॅसेट पासून itunes मधून load केलेल्या गझला पर्यंत सगळ्या इलेक्ट्रोनिक माध्यमातून गालिब ने माझ्याकडे वास्तव्य केले आहे ,तच पुस्तकाबाबत गालिब च्या शायरीच्या पुस्तकापासून ते गुलजार च्या हिंदी -इंग्लिश स्क्रिप्ट पर्यंत . तरी कुणी मागितले तरी त्यापैकी काही द्यायला मन धजावत नाही .
हम ने माना कि तग़ाफुल न करोगे लेकिन
ख़ाक हो जाएँगे हम तुमको ख़बर होने तक।
तेच ग्रेस च्या साजणवेळा बद्दल ही मला वाटतं ,साजणवेळा कार्यक्रमाची कॅसेट मी पुण्याच्या अलूरकर मधून मिळवली होती ,त्याची किती पारायणं झाली ,ते आठवत नाही .माधुरी पुरंदरे चा स्वर तर काळजात रुतला आहे . पण आता पुन्हा cd ,mp ३ मधून ऐकताना त्यातलं कळण्या इतक जगणं ,नाती आपल्याला शिकवतंय असा भास होतो . कालपासून साजणवेळा आणि गालिब आलटून पालटून ऐकतेय ,पुन्हा पुन्हा काहीतरी रुतत जातंय ,काहीतरी सलतंय ,शहर ,माणसं की गालिब ,ग्रेस च्या भावनेचा डोह कुठे डुंबवतोय ते कळत नाही .
जशी दिशा तसा जातो
कोणत्याही गावा .

No comments:

Post a Comment