Tuesday, January 2, 2018

मी वाट बघते आहे …. -कौशिकी चक्रवर्ती

                                                    मी वाट बघते आहे ….
                                                  -कौशिकी  चक्रवर्ती
मला माझं संगीतासोबतचं नातं नेमक्या शब्दांत अधोरेखित करता येणार नाही ,कारण तसा नेमक्या शब्दांत स्पष्ट होण्यासारखा कार्यकारण भाव त्यामागे नाही .मला जसं आठवतं तसं संगीत माझ्या सतत अवतीभवती आहे . त्या अर्थाने मी स्वतःला भाग्यवान समजते की ज्या घराचा श्वासंच संगीत आहे ,अशा घरात मी जन्म घेतला . मला बऱ्याचदा प्रश्न विचारला जातो की ,संगीताशिवाय कुठल्या क्षेत्रांत मला करिअर करायला मला आवडलं असतं ,याचं खरंच काही उत्तर माझ्याकडे नाहीय.कारण तसा प्रश्न मी स्वतःला कधी विचारला नाही . आणि या प्रश्नाचं उत्तर द्यायचंच असेल तर मी एवढंच म्हणेन की ,संगीत नाही तर मीच नाही ,एवढं संगीताने माझं अस्तित्व व्यापलं आहे . संगीताशिवाय जगण्याचा कुठला मार्ग ही मी अवलंबिला नाही किंबहुना तो मला माहीत ही नव्हता आणि म्हणून इतर कुठल्या वाटेने मी जाण्याचा कधी प्रयत्न ही केला नाही .मी दोन अडीच वर्षांपासून संगीताचं शिक्षण घेतेय ,तुम्हा सगळ्यांसारखीच माझी ही आई हीच माझी पहिली गुरु . माझी आई चंदना चक्रवर्ती ही पतियाला घराण्याचीच.तिने विदुषी मीरा बॅनर्जी , बडे खां साहेबांच्या शिष्या यांच्या कडे स्वत: संगीताचं शिक्षण घेतलं होतं. आई नेच मला संगीताचे पहिले धडे दिले.  माझे बाबा पंडित अजय चक्रवर्ती हे त्या काळांत स्वत:च संगीत क्षेत्रात पाय रोवण्यासाठी धडपड करत होते, या क्षेत्रात स्वत:ची ओळख निर्माण करण्याचा त्यांचा संघर्ष सुरु होता .आज संगीताच्या क्षेत्रांत जे चक्रवर्ती घराण्याचं नाव आहे आणि ते आहे बाबांमुळे,त्यांनी ते अविरत कष्ट करून यश मिळवलं आहे .  त्यांच्या व्यस्ततेमुळे  त्यांना माझ्या सुरूवातीच्या शिकण्याच्या काळात मला संगीत शिकवता आलं नाही . पण बाबांनी मला वयाच्या सातव्या वर्षांपासून मात्र घरीच शिकवायला सुरुवात केली.  बाबा गुरु म्हणून खूपंच कडक होते आणि अजूनही आहेत . संगीत हा त्यांच्यासाठी कायम प्राधान्याचा विषय राहिला आहे . तो माझ्यासाठी ही असावा असाच त्यांचा नेहमी प्रयत्न राहिला . याच विचारातून त्यांनी मला  त्यांचे   गुरु पंडित ज्ञानप्रकाशजींकडे संगीताचं शिक्षण  घेण्यासाठी पाठवलं  ,तेव्हा मी वयाने फारंच लहान होते. पुढचे काही दिवस मी त्यांच्याकडे शिकले परंतु वृद्धापकाळामुळे पंडित ज्ञानप्रकाशजीची प्रकृती खालावत गेली आणि चारेक वर्षानंतर माझं त्यांच्याकडे जाणं थांबलं . गुरूजी हे बाबांचे ही गुरू म्हणून बाबा आमच्या दोघांमधला पूल राहिले.मग मी कोलकत्याच्या ITC Sangeet Research Academy मध्ये संगीताचं पुढचं शिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेतला ,बाबा ही तिथेच शिकले होते आणि तिथेच अजूनही शिकवतात .  ITC Sangeet Research Academy ला संगीत क्षेत्रातील दिग्गजांची उज्ज्वल परंपरा आहे ,स्वत: सत्यजित रे ,पंडित ज्ञानप्रकाशजी घोष ,गिरीजा देवी ,माझे बाबा पंडित अजय चक्रवर्ती , उस्ताद राशीद खान ,पंडित उल्हास कशाळकर ,पंडित बुद्धदेव दासगुप्ता ,उदय भवाळकर असे संगीत क्षेत्रातील अनेक दिग्गज त्याच्याशी जोडल्या गेले आहेत . निस्सार हुसेन खां साहेब ,निवृत्तीबुवा सरनाईक ,श्रुती सडोलीकरजी ,गिरिजादेवीजीं ही सगळी संगीतातील दिग्गज मंडळी तिथे होती ,त्यांच्यापैकी काहींना   मी मुलीसारखी आहे तर काहींना मी नातीसारखी आहे . ते सगळे मला कुटुंबातील सदस्यांसारखेच वाटतात . तिथेच मी माझी संगीतातील पदवी प्राप्त केली .
                          मी यापूर्वी सांगितलं त्याप्रमाणे आमच्या घरांत अवती भवती सतत संगीत असल्यामुळे ,घरांत सतत संगीत क्षेत्रातील संबंधित लोकांचा राबता राहिला आहे . उस्ताद झाकीर हुसेन किंवा उस्ताद राशिद खान हे संगीत क्षेत्रातील उस्ताद आहेत अशी ओळख पटण्या अगोदर ते माझे झाकीर चाचा आणि राशीद काकू म्हणून मला परिचयाचे होते .बाबा आणि राशीद काकूंचं तर असं नातं आहे की ,बाबा स्वतःसाठी जेव्हा चपलांचे जोड घेतात तेव्हा त्यांच्यापेक्षा एक नंबर छोटा जोड ते राशीद काकूंसाठी घेतात . तसेच संध्याकाळी  राशीद काकू  घरी यायचे ,ते शामी कबाब बनवायचे  ,ते सगळं रात्री दीड -दोन पर्यंत चालायचं . त्यांना खाण्याचा आणि खिलवण्याचाही खूप शौक आहे . मी अनेकदा बाबांसोबत  त्यांच्या घरी जाऊन या पदार्थांचा आस्वाद घेतला आहे. .अजूनही राशिद काकू मला स्वतःच्या मुलीसारखंच मानतात . ते संगीतातील उस्ताद वगैरे आहेत त्याबद्दल आदर आहेच ,पण त्यापेक्षा अधिक ते राशीद काकू म्हणून मला जवळचे आहेत , तर आमची  एकमेकांच्या कुटुंबं  एकमेकांच्या भावनेने जवळ आहेत . ते अधिक सुंदर नातं आहे असं मला वाटतं.  राशीद काकूंची गायनाची शैली मला प्रचंड आवडते .त्याचा माझ्यावर मोठा प्रभाव आहे.म्हणून एकदा मी गाण्याच्या कार्यक्रमात राशीद काकूंची  राग देश मधील एक  बंदीश एका मैफलीत त्यांच्यासारखीच गायचा प्रयत्न केला परंतु अंतऱ्यातील शेवटची लाईन मला तितकीशी जमली नाही . मग ते दुसऱ्या दिवशी मी राशीद काकूंना फोन करून सांगितलं आणि कबुल ही केलं की मी तुमची बंदिश चोरून गायचा प्रयत्न केला पण मला ती तितकीशी जमली नाही मग त्यांनी हसून ती कशी तंत्रशुद्ध पद्धतीने गायची याचं प्रात्यक्षिक फोन वर गाऊन दाखवलं आणि ती पूर्ण बंदिशच त्यांनी  मला फोन वर शिकवली . आमची ती संगीत मैफल किती तरी वेळ फोन वरच रंगली होती . तेच मला उस्ताद झाकीर हुसेन यांच्याबद्दल ही म्हणावसं वाटतं . माझ्याकडे आमच्या दोघांचा असा एक जुना फोटो आहे ,त्यांत झाकीर चाचूने मला त्यांच्या कडेवर घेतलं आहे ,त्यावेळी माझं वय होतं अवघं तीन . त्यानंतर मी तिशीची असताना नेहरू सेंटर मधील माझी मैफल ऐकायला झाकीर चाचू प्रेमाने साधा शर्ट पायजमा घालून आले आणि माझ्यापुरतं आमच्या स्नेहाचं एक वर्तुळ पूर्ण झालं . हा सगळा माझा प्रवास मलाच विस्मयचकित करतो . या पेक्षा वेगळं स्वप्न ते काय असं वाटणारं एक  स्वप्नवत आयुष्य मी जगतेय . आणि या पेक्षा अधिक काही मी आयुष्याकडून अपेक्षाच करु शकत नाही इतकं काही मिळालंय .
       संगीताची पदवी प्राप्त करण्यासोबतच मी जेव्हा भारतीय तत्त्वज्ञानामध्ये पदव्युत्तर शिक्षण कोलकात्याच्या जाधवपूर विद्यापीठातून पूर्ण करण्याचा निर्णय घेतला तेव्हा सुरुवातीला बाबांची  त्यासाठी समंती नव्हती . मी तत्वज्ञानात शिक्षण पूर्ण करू नये अशी त्यांची भूमिका मुळीच नव्हती परंतु मी ते पूर्णवेळ न करता अर्धवेळ किंवा दूरस्थ शिक्षणपद्धतीने पूर्ण करावं असं  त्यांचं मत होतं . त्यामागे ही त्यांची अशी भूमिका होती ,की त्यामुळे माझं संगीतावरचं concentration कमी होईल . कारण  यापूर्वीच मी सांगितल्याप्रमाणे, संगीत हा त्यांच्यासाठी  प्राधान्यक्रमाचा विषय राहिला आहे .मी आणि संगीत यांत कुणीच यायला नको,अशा आशयाचा त्यांचा विरोध होता. मा आणि बाबा या दोघांनी ही त्यांचं पदव्यूत्तर शिक्षण रविंद्र भारती विद्यापीठातून संगीतातंच पूर्ण केलं आहे.,परंतु मला संगीताचं असं academic पद्धतीचं शिक्षण घ्यायचं नव्हतं.म्हणून मी मला आवडणार्या तत्वज्ञान या विषयांत  पदव्यूत्तर शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला.जाधवपूर विद्यापीठातील तत्वज्ञानाची फँकल्टी आशियातील सर्वोत्तम फँकल्टी समजली जाते.जेव्हा माझ्या तत्त्वज्ञानातील पदव्युत्तर शिक्षणामुळे संगीताकडे दुर्लक्ष होऊ देणार नाही ,असं बाबांना आश्वस्त केल्यावर त्यांनी परवानगी दिली . मला स्वतःला भारतीय संगीत आणि तत्वज्ञान हे एकमेकांशी खूप संलग्न असल्याचं जाणवतं ,म्हणून तत्वज्ञान शिकणं ही माझ्यासाठी सहज आणि स्वाभाविक प्रक्रिया होती म्हणून तशी ती मला  माझ्या संगीताच्या प्रवासांतही प्रतिबिंबित होताना दिसतं .मी जो काही तत्वज्ञानाचा अभ्यास केला ,जे काही शिकले त्यातून जी विचारसरणी विकसित झाली त्यातून मला माणसं ,जगणं आणि मुख्य म्हणजे माझं संगीत अधिक चांगल्या प्रकारे आत्मसात करता येतं ,ते अधिक चांगल्या पद्धतीने समजून ही घेता येतं . संगीत आणि तत्वज्ञान या दोन गोष्टी माझ्यासाठी सहज एकमेकांमध्ये मिसळलेल्या आहेत ,जाणीवपूर्वक नाही.या दोन्ही गोष्टी मला माझी स्वतःची ओळख होण्यासाठी ,आत्मशोध घेण्यासाठी मदतीच्याच ठरत आहेत आणि तो तसा ही संगीत आणि फिलॉसॉफी यांचा  एकमेकांसोबतचा सहज प्रवास आहे ,ओढून ताणून एकमेकांशी  जोडलेला नाही .  
                      संगीताचं माझं शिक्षण तर अव्याहतपणे सुरुच आहे , माझी आईच माझी पहिली गुरु .  तिनेच मला पहिल्यांदा  संगीताच्या सुंदर जगात आणलं . मा ने मला माझ्या आतलं संगीत एवढ्या लहान वयात शोधण्यासाठी मदत केली . आता आपण बघतो जगण्याच्या वेगात लहान मुलातले असे सुप्त गुण शोधण्यासाठी पालकांकडे असा वेळचं नाहीये . या पार्श्वभूमीवर मला माझ्या आईविषयी जास्तच आदर वाटतो की ,तिने तो वेळ मला दिला . मला त्याचं  खूप मोल वाटतं .  मला माझ्यातलं संगीत शोधण्यासाठी तिने मदत केली म्हणूनच संगीत फक्त माझ्यासाठी छंदाचाच एक भाग न राहता तो  माझ्या जगण्याचा भागंच नव्हे तर संगीत  माझ्या अभिव्यक्तिचं एक सुंदर माध्यम ही झालं .   अंधारातून प्रकाशाकडे नेणारा हा प्रवास आपण गुरूंसोबत करतो अशी माझी ठाम धारणा आहे . म्हणून माझ्यावर या सर्वांचं मोठं ऋण आहे . मी संगीताचं शिक्षण वेगवेगळ्या टप्प्यात वेगवेगळ्या गुरूंकडे घेतलं आणि ते शिक्षण थांबलेलं नाही अजून सुरूच आहे .माझे  बाबा माझ्यासाठी संगीताचा वेगळा प्रकाश आहेत ,कदाचित त्यामुळेच मी वेगवेगळ्या गुरूंकडे संगीताचं शिक्षण घेऊ शकले कारण बाबांनी शिक्षण घेण्याचा मार्ग माझ्यासाठी खुला केला होता . त्यांनी मी कधी ,कुठे आणि कसं शिकायचं हा प्रत्यक्ष शिकण्यापूर्वीचा  महत्वाचा भाग मला  शिकवला . शिक्षक आणि गुरु यांतही मला वाटतं हाच महत्वाचा फरक आहे. शिक्षक आपल्याला एखादा विषय शिकवतो आणि गुरु त्याचे अनुभव,मोठेपण आणि ज्ञानातून मिळणाऱ्या आत्मशोधाचा अनुभव शेअर करतो . मी संगीताचं उत्तम ज्ञान घेणारी कशी होईल या कडे बाबांनी जाणीवपूर्वक लक्ष दिलं . आपल्याला  जगण्याचा  प्रत्येक क्षण ज्ञानाचं मोठं भांडार खुलं करून देतो ,त्यातलं नेमकं चांगलं कसं आणि कधी निवडायचं ,चांगलं आणि वाईट यातील निवडीचा निर्णय  ही बौद्धिकदृष्ट्या न घेता आध्यत्मिक अर्थाने कसा घ्यायचा हे सगळं बाबांमुळे मला शिकता आलं .चांगलं किंवा वाईट हे vibes ने ठरवायचं ,चांगल्या गोष्टींना प्रतिसाद कसा द्यायचा ,चांगल्या गोष्टींशी कनेक्ट कसं व्हायचं  किंवा चांगल्या कुठल्या गोष्टी आहेत हे  बौद्धिक दृष्ट्या नाही तर  भावनिक दृष्ट्या ठरवायचं . त्याचा विचार करायचा हा सगळा विचार आचरणात आणण्यासाठीची स्ट्रेंग्थ मला बाबांमुळे मिळाली . त्यामुळेच मी माझ्या आयुष्यात अनेक वेगवेगळ्या गुरूंकडून संगीताचं ज्ञान घेऊ शकले .  मला गुरूंनी दिलेलं ज्ञान केवळ त्या त्या विषयापुरतं मर्यादित न राहता ,माणूस म्हणून आपण समृद्ध होण्यासाठी ते आवश्यक आहे असं मला वाटतं . कुणी मी गायलेल्या बंदिशींना दाद द्यावी  आणि ती मिळणारी दाद सतत मिळत राहावी अशी आस मनाला लागलेली असते आणि ती आसंच मग आपला कलेची नित्य नूतन शिखरे शोधण्याचा  ध्यास बनते . राशिद काकू, झाकीर जी ,शोभा गुर्टुजी ,परवीनजी,किशोरीजी,बरकत अली खां साहेब बडे अली खां साहेब ,आशाजी,लताजी आणि किशोर कुमार जी हेच नव्हे तर  आता ची श्रेया घोषाल  या सगळ्यांकडूनच आणि यांच्या गाण्यातून  मी काही ना काही रोज शिकत असते . या सगळ्यांचं ऐकत ऐकत मी शिकत नकळत मी शिकत असते ,ते शिकण्याचे क्षणंच मला  जगण्यातलं अंतिम सत्याचा साक्षात्कार देतात.  तेच क्षण शुद्ध संगीताचे चे असतात,तेच क्षण सच्च्या सुराचे आणि अच्च्छ्या सूराचे ही असतात.बाबांनी मला या सगळ्यांत नेमकं काय,कधी आणि केव्हा शिकायचं हेच नेमकं शिकवलं.असे सच्च्या सूरांच्या  अनेक क्षणांना मला बाबांमुळे भिड़ता येतं.त्यामुळे बाबांचं माझ्या मनांत सर्वार्थाने  वेगळं स्थान आहे आणि ते कायमच राहिल.बाबांशी माझं नातं अनेक पदरी आहे,ते एकाच वेळी माझे बाबा,गुरू आणि गुरू बंधू ही आहेत.अशा अनेक नात्याने मी बाबांशी बांधली गेले आहे.बाबा माझ्या आयुष्यांतील सर्वात मोठे टास्क मास्टर राहिले आहेत.मी त्यांना अनेकदा घाबरते,ते अनेकदा हिटलर किंवा यमराज पेक्षा ही भयंकर वाटतात मला.तानपूर्याच्या मागचे बाबा तर ओह गॉड!

    मला बाबांचेच कर्नाटक संगीतातील गुरू बाल मुरली कृष्णनजी यांच्या कडे ही काही दिवस शिकण्याची अतिशय मौलिक संधी मिळाली.तो अनुभवंच एकूण विलक्षण होता.कर्नाटक संगीताचा प्रवास हिंदुस्थानी संगीता पेक्षा ही वेगळ्या वाटेचा आहे .त्यांत खूप सारं संगीत तर आहेच,सोबत गणित ही आहे.एकाच वेळी राग,तालाच्या अंगाने त्याचा प्रवास हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या प्रवाहाशी समांतर ही जातो आणि तंत्रशुद्धतेच्या अंगाने वेगळा ही होतो.त्यातली शिस्त आणि मौलिकता मला बाल मुरलीजींमुळे शिकता आली.बाल मुरलीजी आणि पं.ज्ञानप्रकाशजी या दोघांचीही  वैचारिक जडणघडण समजून घ्यायला ती दोघे बाबांचेही गुरू असल्यामुळे मदत झाली.
     पण हे सगळं संगीतामुळे आणि संगीतासाठीच असतं याची खोल जाणीव माझ्या मनांत आहे आणि म्हणून बाबा माझे सर्वांत मोठे प्रेरणास्त्रोत आहेत.त्यांच्यासाठी संगीता पेक्षा काहीही महत्वाचं नाही आणि माझ्यासाठी तसंच असावं त्यासाठी त्यांचे सतत प्रयत्न असतात.
          कोलकात्यात  माझा जन्म झाला आणि तिथेच माझी सुरुवातीची सांगितिक जडण घडण झाली. या शहरांत  संगीताची मोठी परंपरा आहे.तिथल्या मातीत आणि श्वासांतही संगीत दरवळतं आहे.कोलकत्याचा संगीत प्रवाह छोट्या गल्लीबोळापासून,मोहल्ल्यांपासून ते  डोव्हर लेन फ़ेस्टीवल (कोलकत्त्यांतील महत्वाचा संगीत महोत्सव )पर्यंत पसरलेला
आहे.मला अभिमान आहे की,अशा संगीत भारलेल्या कोलकत्ता शहरांत मी वाढले.मैहर-सेनिया घराण्याचे संस्थापक बाबा अल्लाउद्दीन खॉं साहेबांचं वास्तव्य ही बराच काळ कोलकत्याला होतं.पण मूळचे ते बांगला देश मधील गौरीपूर गावचे. आमचे पूर्वज ही बांगला देशमधूनंच कोलकात्याला स्थलांतरीत झालेले.बांगला देश मध्ये असताना माझे आजोबा बाबा अल्लाउद्दीन यांच्या शेजारच्या गावीच वास्तव्यास होते. ते तिथून गौरीपूर ला बाबांच्या गावी,त्यांचं वादन ऐकायला जात.बाबांचेच सुपुत्र उस्ताद अली अकबर खॉं यांनी ही Ali Akbar music school हे पहिल्यांदा १९५६ मध्ये कोलकत्यालाच सुरू केलं.नंतर स्वतः ते सँनफ्रान्सीस्को ला शिफ्ट  झाले  .संगीतकार आर.डी.बर्मन ही त्याच school चे विद्यार्थी .पंडित ज्ञानप्रकाशजी ही त्याच संगीत विद्यालयाशी काही काळ संबंधित होते.
      कोलकत्त्याचा  तो काळ अभिजात संगीताचा सुवर्ण काळ होता ,त्या काळातलं कोलकत्ता संगीतात् पूर्ण न्हालेलं होतं. त्या काळच्या अनेक गोष्टी मी ऐकते.तेव्हाचा अविभाजीत भारत संगीताच्या दृष्टीने कोलकत्त्यात एकवटला होता.त्या काळी ट्राम्स असायच्या,आज ही आहेत.ट्राम स्टेशन वर लोकं वर्तमानपत्रे अंथरून त्यावर बसून बड़े ग़ुलाम अली खॉं साहेबांच लाऊड स्पीकर वर सकाळी चार-पाच पर्यंत गाणं ऐकायचे.तिथला एक किस्सा मला बड्या बुजुर्गांकडून ऐकल्याचा आठवतोय  . कोलकत्यापासून तीस चाळीस कि.मी.वर उत्तरपाडा  जिथे आता माझे सासू सासरे राहतात. तिथे उत्तरपाडा  चक्र नावाचा एक जुन्या संगीत विषयक काम करणाऱ्या संस्थेचा वार्षिक संगीत महोत्सव भरायचा,त्या पटांगणाच्या बाहेरच एक दुकान होतं,तिथे चहा आणि भजी मिळायचे.एकदा वार्षिक महोत्सवाच्या वेळी  सकाळी चार वाजता बड़े ग़ुलाम अली खॉंसाहेब यांचा परफ़ॉर्मन्स होता.पण ते वेळेच्या आधीच तिथे पोचले आणि त्यांच्या आधी परफॉर्म करणारा कलावंताला त्याचं गाणं संपवायला अधिक वेळ लागणार होता म्हणून खां साहेब  बाहेरंच चहा घेत बसले.आतलं संगीत ऐकून खॉं साहेब प्रेरित झाले आणि तिथेच ते एका क्षणाचाही विलंब न लावता गायला लागले. त्यांचं  ते बहारदार गाणं ऐकून बाहेरचीच नव्हे तर अर्ध्या तासाच्या आत ऑडिटोरियम मध्ये असलेला रसिक मोठ्या संख्येने बाहेर आला आणि  तो चहावाला हे बघून विस्मयचकित झाला . हा किस्सा  सांगणारे अनेक जण आज वयाची सत्तरी पार केलेली आहेत . . अशा पद्धतीचं संगीताने भारलेलं वातावरण कोलकत्त्याचं होतं आणि असं  फक्त मोठ्या स्वरूपाच्या मैफलींच्याच बाबतीत नाही तर छोट्या बैठकीच्या बाबतीतही होत होतं.अतिशय सुजाण ,संगीताची जाण आणि समज असणारा,दाद देणारा  रसिक कोलकात्यात आहे . पण आता काळानुसार आणि वेगाच्या वेडांत यांत आता खूप बदल होतोय. शास्त्रीय संगीताचं प्रभाव ही थोडा फार ओसरतोय असं वाटतं.त्यापेक्षा  बदलत्या काळांत महाराष्ट्राचं याबाबतचं चित्र अधिक आश्वासक आहे आणि त्याच्याशी मी वीस वर्षाहून अधिक काळ जोडल्या गेली आहे.महाराष्ट्रातील सध्याचं संगीताचं वातावरण अधिक आश्वासक आहे . महाराष्ट्रातील या संगीत परंपरेला मी गेली वीस वर्षे अधिक जवळून पहाते आहे ,अनुभवते आहे . माझे गुरू उल्हास कशाळकरजी,श्रुति सडोलीकरजी किंवा पंडित वसंतराव देशपांडे जी ही सगळी महाराष्ट्रीयन आहेत,इतकंच नव्हे तर मी या काही वर्षांमध्ये पुणे,सांगली,सातारा,कोल्हापूर,रत्नागिरी इतकंच नव्हे तर अगदी मिरजेपर्यंत गावांगावांत मी गायलेय,मुंबई सोबतंच महाराष्ट्रांतील अनेक शहरांत हेच संगीताच्या बाबतीत भारलेलं वातावरण आहे तसेच महाराष्ट्रांतील रसिक संगीताचा खूप जाणकार आहे असं वाटतं.एकदा मी  नाशिकला गणपतीच्या काळात एका रस्त्याच्या मधोमध असणाऱ्या चौकात आयोजित केलेल्या मैफलीत गायले . चौकातच खुर्च्या आणि पेंडॉल टाकून मैफलीची व्यवस्था करण्यात आली होती ,दुसरे दिवशी एका परिचितांच्या घरी सकाळचा नाश्ता करून  त्या चौकातून कार ने बाहेर पडताना, माझ्या लक्षात आलं की हा तोच चौक आहे आणि इथेच  खुर्च्या टाकून आधीच्या रात्री करण्यात आलेल्या गाण्याच्या  कार्यक्रमात आपण  गायलोय  . हे असं सगळं संगीताने भारलेलं वातावरण मला अभिजात संगीताच्या दृष्टीने प्रेरणादायी वाटतं .  महाराष्ट्रात सगळीकडेच विशेषतः पुण्यात गायला मला खूप आवडतं.तिथे संगीताचं सुंदर वातावरण आहे . पुण्यात एकदा दिवाळी पहाट च्या वेळी वेगवेगळ्या ठिकाणी ,छोट्या -मोठ्या चाळीस मैफली सुरु होत्या आणि सगळ्या हाउसफ़ुल .मी नेहमी आणि कायमंच म्हणत आलेय की,महाराष्ट्रांत संगीताचं फ़ार चांगलं वातावरण आहे.मला महाराष्ट्रीयन लोकांनी खूपंच प्रेमाने स्वीकारलं .म्हणून मी स्वत:ला बंगाल इतकंच महाराष्ट्राचीही समजते.नॉन महाराष्ट्रीयन गायकांना खुल्या दिलाने स्वीकारण्याचा मोठेपणा त्यांच्याकडे आहे.
               शास्त्रीय संगीतासोबतंच मी लाईट म्युझीक ही गातेय.ए.आर.रहमानजींसोबत मी वीस वर्षांची असताना बाबांसोबत दीपा मेहतांच्या फ़िल्म “ वॉटर” साठी वैष्णव जनतो गायलेय.तो खूप सुंदर अनुभव होता.नंतर ऋतुपर्णो घोष यांच्याही फ़िल्म साठी ही गायलेय.मध्ये मी कोक स्टुडिओ साठी मी शांतनू मोईत्रा साठी गायलेय ,एवढंच नव्हे तर,शंकर एहसान लॉय यांनी कंपोज़ केलेल्या मिर्झीया या चित्रपटासाठी गायलेय.हा प्रवासंही सुरू आहेच.रवींद्र संगीत आमच्या बंगाल्यांच्या नसानसांत भिनलेलं आहे.माझ्या आईसाठी गुरूदेव रविंद्रनाथांची “गीतोबीतान “ गीता किंवा बायबल सारखंच आहे.तीच भावना प्रत्येक बंगाली माणसांची रविंद्र संगीताबाबत असेल.म्हणून जगाच्या पाठीवर कुठेही असणारा बंगाली रवींद्र संगीत गुणगुणतोच.
       संगीत माझ्या बायलॉजिकल लिगसी आहे पण ते कंपल्सरी नसावं असं आता मला वाटतं.
     आमच्या घराण्यात संगीत आहे ,म्हणून ही गाणं माझ्यापर्यंत  झिरपत झिरपत आलं . पण हाच घराण्याचा गाण्याचा धागा माझ्या धाकट्या  भावाला प्रत्यक्ष गाण्याकडे वळवू शकला नाही . तो संगीताशी वेगळ्या पद्धतीने जोडला गेला आहे . तो वृत्तीने संगीतकार आहे  तसंच साऊंड इंजिनीरिंग /साऊंड स्केपिंग चं तांत्रिक शिक्षण त्याने घेतलं आहे आणि त्या क्षेत्रात तो त्याचं काम करतोय . त्यामुळे घराण्याच्या वारशासोबतच  स्वतःचा उपजत कल ओळखणं ही महत्वाचं  आहे ,असं मला वाटतं . माझा मुलगा रिशीथ जेमतेम सहा -सात वर्षांचा आहे ,पण त्याला  गाण्यापेक्षा तबला वाजवण्यात सध्या तरी जास्त रस दिसतोय.  पुढे हाच कल असेल किंवा अजून काही बदल होतील ते सांगणं कठीण आहे .परंतु  त्याने आयुष्य समृद्ध करण्यासाठी  संगीत आत्मसात करावं असा माझा मनापासून प्रयत्न असेल .बाकी त्याच्या निर्णयाचं मी स्वागत आणि आदर करेल .
       बाबा श्रुतीनंदन या संगीतासाठी वाहिलेल्या संस्थेच्या माध्यमातून हजार पेक्षा ही जास्त विद्यार्थ्यांना संगीत शिकवत आहेत . श्रुतीनंदन च्या माध्यमातून बाबा वेब द्वारे ही संगीताचं शिक्षण देतात .  निसर्गात अस्तित्वात असलेल्या संगीताचं आकलन आणि त्याचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करण्यासाठी बाबानी श्रुतीनंदन ची स्थापना केली . त्यांचे ऑनलाइन पद्धतीने ही संगीत शिकणारे हजार पेक्षा ही जास्त विद्यार्थी जगभर विखुरलेले आहेत . मी काही वर्षं श्रुतीनंदन च्या माध्यमातून शिकवण्याचा प्रयत्न केला पण सध्या तरी मला ते शक्य होईल असे वाटत नाही . त्यासाठी एक प्रकारची शिस्त ही लागते आणि स्वतःच्या ज्ञानाची पुनरावृत्ती करण्याची पुन्हा पुन्हा तयारी ही आवश्यक असते . तिथे काही नियम तुम्हाला पाळायला लागतात.विद्यार्थ्यांच्या कलेनं ते घेताना तुमच्यात त्यांना हवे तसे बदल ही करायला लागतात.मा आणि बाबा यांनी त्यासाठी स्वतःचं आयुष्य वाहून घेतलं आहे परंतु त्यासाठीची मनोभूमिका अजून माझी स्पष्ट नाही . ती स्पष्ट झाल्यावरच मी कदाचित शिकवण्याचा विचार करू शकेल ,सध्या मीच विद्यार्थ्यांच्या भूमिकेत आहे आणि ती शिकण्याची प्रोसेस मी समरसून एन्जॉय करण्याचा प्रयत्न करतेय . संगीत हे माझ्यासाठी कुठेतरी जाणं ,काहीतरी मिळवण्याचं साध्य नसून ,स्वतःचा पुन्हा पुन्हा आत्मशोध घेण्याचं साधन आहे . जसा एखादा चित्रकार ,त्याच्या चित्राच्या माध्यमातून स्वतःचा शोध पुन्हा पुन्हा घेण्याचा प्रयत्न करतो ,तेच मी संगीताच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करते .हा प्रवास माझा एकटीचा,स्वत:ला समृद्ध करत जाणारा प्रवास आहे तसेच संगीताच्या असीम विश्वात ,स्वतःचा सांगितीक कोपरा शोधण्याचा हा प्रवास आहे .
                               बाबा माझे वडील आहेत ,पण गुरु त्याहून अधिक आहेत . गेली पंच वीस वर्षाहून जास्त काळ मी सतत गातेय . बाबांची दाद तर सोडाच ,पण  मी बरी गायलेय असं ही ते अजून म्हणालेले नाहीत . म्हणजे त्यांना अपेक्षित असणारं परफेक्शन अजून माझ्या गाण्यात नाही असं त्यांना वाटतं . कुठल्याही मैफलीत ते समोर असल्यावर त्यांना माझ्या गाण्याबद्दल विचारलं तर ते सरळ म्हणतात ,तुझा मूड का ठीक नव्हता ,गाण्यावर तुझं लक्ष केंद्रित का होत नव्हतं ,तू स्टेजवर टाइम पास का करत होतीस . एक ना अनेक त्यांच्या माझ्या गाण्याबाबत  तक्रारी असतात . माझं गाणं परिपूर्ण असावं असा त्यांचा ध्यास असतो . त्यामुळे मला अजूनही प्रतीक्षा आहे ,त्यांनी माझ्या गाण्याला दाद देणं तर दूर  फक्त  मी बरं गायलेय असं त्यांनी कधीतरी म्हणावं .                     
मी वाट बघतेय बाबांच्या  या प्रतिक्रियेची .


                                                     

No comments:

Post a Comment